Description
कबिरांच्या दोह्यांमध्ये गुरूविषयीच्या दोह्यांची संख्या बहुधा सर्वाधिक असावी. गुरूला गोविंदाआधी नमन करावे असे त्यांना वाटते, कारण गुरूमुळेच गोविंद कळतो. त्यामुळे कऱ्हाडेंनीही या पुस्तकात शंभरपैकी पंचवीसहून अधिक गुरुविषयक दोहे घेतले आहेत व अनेक उदाहरणे व अवतरणे देऊन स्वतःसुद्धा गुरूचे महत्त्व मानले आहे. गुरू व शिष्यांची कर्तव्ये, जीवनाची क्षणभंगुरता, संतसज्जनांचे स्वभाव, ईश्वराच्या भक्तीचे मार्ग, भक्तीचे ढोंग करणारी माणसे, माणसाची जीवनातली कर्तव्ये, जातीपेक्षा गुणांना असणारे महत्त्व, जीवनविषयक योग्य दृष्टिकोन, जीवनाचे महत्त्व ओळखून असणे, जप व नामस्मरणाचे महत्त्व, बढाया मारणारी माणसे अशा विविध विषयांवरचे दोहे कऱ्हाडेंनी निवडले आहेत. “मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती, न काहू से बैर।” किंवा “कबीर हमारा कोई नहीं हम काहू के नाहिं।” ही फक्कड वृत्ती, अलौकिक त्यागवृत्ती व निर्मोहीपणा दाखवणारे दोहेही त्यांनी निवडले आहेत. या वैविध्यावरून असे दिसते की त्यांनी कबिरांचा सखोल अभ्यास केला आहे. कबिरांच्या महासागरासारख्या दोह्यांच्या संभारातून शंभर दोहे निवडणे सोपे नव्हते. ते अवघड काम लेखकाने या वैविध्यातून साध्य केले आहे.
डॉ सुप्रिया सहस्रबुद्धे





Reviews
There are no reviews yet.